तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी १५ एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ठेवा अशी मागणी मोदी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी BCG च्या अहवालाचा हवाला दिला आहे. ३ जूनपर्यंत भारतात परिस्थिती आटोक्यात येईल असं या अहवालात म्हटल्याचं राव यांनी स्पष्ट केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवण्याची मागणी केली आहे. खरंतर लॉकडाउन संपण्यासाठी १४ एप्रिल ही तारीख अजून उजाडायची आहे. मात्र तो संपण्याआधीच के चंद्रशेखर राव यांनी आणखी दोन आठवडे भारतात लॉकडाउन हवा अशी मागणी केली आहे.

२५ मार्च ते १४ एप्रिल या २१ दिवसांच्या कालावधीसाठी देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्याआधी २२ मार्चच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर २५ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत देशात लॉकडाउन पुकारण्यात आला. आता हा कालावधी आणखी वाढवावा अशी मागणी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

भारतात करोनाग्रस्तांची संख्या ४ हजारांच्या वर गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि येत्या काळातही ही संख्या वाढू शकते हे लक्षात घेऊन लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवावा असं राव यांनी म्हटलं आहे. अद्याप लॉकडाउन नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. मात्र आता तेलंगणचे मुख्यमंत्री राव यांनी केलेल्या मागणीवर मोदी सरकार काही विचार करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.