आज मी त्याची खूप वाट पाहिली. त्याच कट्ट्यावर, पण तो आलाच नाही. त्याच्या ग्रुपमधलंही आज कोणीच दिसलं नाही. कोणी नाही तर तो अतुल आणि त्याची मैत्रीण तरी लेक्चर संपल्यावर कट्ट्याच्या इथून फेऱ्या मारत बोलताना दिसायचे. आज तेही नाही दिसले. पण मी का अस्वस्थ होतेय तो एक दिवस नाही दिसला तर? मला तर त्याचं नाव पण माहिती नाही… ऋचाच्या डायरीतील साधारण १६ व्या दिवशीचं पान. ऋचा न चुकता रोज डायरी लिहायची. खरंतर ही तिच्या बाबांचीच सवय, आता नकळत तिला लागलेली. सुरुवातीला बाबांनी दिलेल्या पॉकेटमनीचा हिशोब लिहिता लिहिता ती रोजनिशी कधी लिहायला लागली तिचं तिलाच आठवत नव्हतं. कॉलेजमध्ये सेकंड इयर सुरु झाल्यापासून ती लेक्चर संपल्यावर मैत्रिणींबरोबर बसायची त्या कट्ट्याजवळून तो एकदा तरी जायचाच. ते बोलले नव्हते एकमेकांशी कधीच पण नजरेतून भेटायचे ते एकमेकांना अगदी न चुकता. मधे रविवारची एक सुटी आली तरी अस्वस्थ व्हायचे दोघेही. पण आज तर मंगळवार असूनही तो न आल्याने ऋचाला काही सुचेनासे झाले होते.

कालच तर दिसलेला, आज अचानक काय झाले तिला कळेना. तिच्या मैत्रीणींनाही ही गोष्ट माहिती नसल्याने ती व्यक्तही होऊ शकत नव्हती. मात्र तिचा कावराबावरा झालेला चेहरा मैत्रिणींनी हेरला होता. सई आपल्या जर्मनच्या नव्या क्लासबद्दल काहीतरी सांगत होती. पण ऋचाचे त्याकडे अजिबातच लक्ष नव्हते. ती आपल्याच विचारात शून्यात एकटक बघत होती. मग मनालीने तिला हलवले आणि भरकटलेल्या विचारांच्या जंजाळातून ओढून वास्तवात आणले. मग त्या सगळ्यांनी तिची खूप खेचली. काय झालंय काय बाईसाहेब अचानक कसला इतका विचार करताय? कोणी आवडायला लागलंय की काय? आणि आम्हाला नाही सांगणार का तू, असं म्हणत सईने तिला थोड्याशा गुदगुल्याही केल्या. मात्र ऋचा अजूनही तो आज का आला नसेल याच विचारात होती. त्याला काही झालं तर नसेल ना? म्हणजे आजारी किंवा अपघात वगैरे, की त्याच्या घरी काही घडलं असेल? की अचानक कुठे बाहेरगावी जायला लागल्यामुळे तो आला नसेल अशा एक ना अनेक विचारांनी तिच्या डोक्यात काहूर माजलं होतं. मुख्य म्हणजे याबाबत कोणाकडे चौकशी करणंही शक्य नसल्यानं ती जास्त अस्वस्थ झाली होती. त्यात या मैत्रिणींचं आणखीनच काहीतरी… ती आपल्या मनातच पुटपुटली…

काहीवेळ चेष्टामस्करी झाल्यानंतर सई आणि मनालीला अचानक सेल्फी काढायची आठवण झाली. मग छानछान पोज देत त्या कट्ट्यावरच सईच्या नवीन मोबाईलमधून सेल्फीही काढायला लागल्या. मात्र या बाईसाहेब आपल्याच तंद्रीत. एव्हाना ऋचाची नजर भिरभिरायला लागलेली. त्याच्या ग्रुपमधंल कोणी दिसतंय का, याचा शोध ती कावरीबावरी नजर घेत होती. त्याच्यासोबत रोज असणारा एखादा मित्र किंवा मैत्रीण जरी दिसली असते तरी तिच्या जीवात जीव आला असता. मात्र जवळपास १ तास होत आला तरी कोणाचाच थांगपत्ता नाही. सेल्फी काढणाऱ्या या मैत्रीणांचा तिला कधी नव्हे तो राग यायला लागला होता. एरवी त्यांच्यात रमणाऱ्या हसून-खिदळून मज्जा करणाऱ्या ऋचाला त्या काही वेळासाठी का होईना पण अचानक नकोशा वाटायला लागल्या होत्या. मनालीला आपला फोटो छान कसा येईल याचंच पडलं होतं. तर ऋचाने फोटोपुरते तरी हसावे म्हणून काहीतरी जोक मारुन तिला हसवायचा प्रयत्न सई करत होती. मात्र काही केल्या बाईसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव लपेनात. शेवटी कसेबसे पाच-सहा क्लिक्स झाल्यावर आता निघायचं का की तुला अजून पण असंच बसायचंय इथे, असं चिडून मनाली म्हणाली. तेव्हा ऋचा काहीशी भानावर आली आणि गोंधळतच हो हो माझी १२.३५ ची लोकल आहे, असं म्हणत कट्ट्यावरुन उठली. मात्र रेल्वे स्टेशनवर जाईपर्यंत तिच्या डोक्यात तेच चक्र चालू होते. या वाटेवरही तो कधीतरी त्याच्या मित्रांसोबत दिसायचा. मग ती कोणत्या लोकलमध्ये बसते हेही टिपायचा.

ती मैत्रिणींसोबत स्टेशनकडे जायला निघाली खरी पण तिचं मन मात्र अजून कट्ट्यावर आणि त्याच्या विचारातच अडकलं होतं. जुलै महिना असल्यानं पाऊसही येत-जात होता. मधेच एखादी मोठी सर येऊन सुरळीत चाललेले दैनंदिन व्यवहार विस्कळीत करत होती. एरवी तिला पाऊस खूप आवडायचा. छत्री असेल तरीही ती भिजत, हातात पावसाचे पाणी झेलत अतिशय आनंदात जायची. मात्र हाच पाऊस तिला आज अचानक नकोसा झाला होता. एक लहानशी सर आली तशी तिनं आपल्या सॅकमधून छत्री काढली आणि काहीसा वैताग करतच ती डोक्यावर धरली. एकीकडे सई आणि मनाली आपल्याच विश्वात रमलेल्या. ऋचाला कदाचित एकांत हवा असेल या समजुतीने त्यांनी तिला तो दिला. मैत्रीतली स्पेस जपण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. स्टेशनजवळ यायला लागलं तशी हिची घालमेल आणखीनच वाढत होती. तो आज न येण्यामागचं कारण काय असेल याच्या विचाराने तिच्या डोक्याला एव्हाना मुंग्या येण्याची वेळ आली होती.

अखेर ती स्टेशनवर आली. तिची रोजची १२.३५ ची लोकल प्लॅटफॉर्मवर जणू तिचीच वाट पाहात असल्याचे तिला वाटले. मग ती सई आणि मनालीला बाय करत स्वतःच्याच नादात चालत लोकलमध्ये चढणार होती इतक्यात समोरुन काहीसा त्याच्यासारखाच दिसणारा एक मुलगा गेला. काही क्षण तिला तो तोच असल्याचा भासदेखील झाला. मात्र लगेचच ती भानावर आली आणि लोकलमध्ये चढली. नेहमी अगदी घाईने आत शिरत जागा पकडणारी ती आज अतिशय जडपावलाने आतमध्ये येत होती. सगळ्या जागा भरल्या मग तिला एका ठिकाणी चौथ्या सीटवर बसावं लागलं. कशीतरीच अधांतरी अंग आखडून ती तिथे बसलीही. ‘पुढील स्टेशन…’ अशी न थकता अनाऊंन्समेंट करणारी बाई एव्हाना तिला नकोशी झाली होती. एरवी या आवाजाकडे तिचे लक्षही जात नसे. इतर मुली कोणी मोबाईलमध्ये रमलेल्या, कोणी काही खाण्यात तर कोणी गप्पा मारण्यात दंग, काही जणी चाफा आणि मोगरा घेत होत्या, तर काही अतिशय आवडीने कानातले आणि डोक्याला लावायच्या क्लिपा पाहात होत्या. कधी नव्हे ते ऋचाला या सगळ्याचा उगाचच राग येत होता.

मग अचानक तिला लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू ही काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये वाचलेली बातमी आठवली. त्यानंतर पुन्हा त्याचा चेहरा समोर आला. असे तर काही झाले नसेल ना या विचाराने ती आणखीनच कावरीबावरी झाली. मग तिला सेल्फी काढताना कड्यावरुन पडून ३ मित्रांचा मृत्यू ही बातमी आठवली आणि ती आणखीनच हळहळली. या गोष्टीही अशा नको तेव्हा का डोळ्यासमोर येतात हे तिला समजत नव्हते आणि ती आणखीनच सैरभैर होत होती. काही वेळाने तिचे लक्ष त्या ‘पुढील स्टेशन’वाल्या बाईकडे गेले आणि आपले स्टेशन आले हे लक्षात येऊन ती भानावर आली. मग स्टेशनवर तिला एकमेकांना बाय करताना डोळ्यात प्राण आलेले एक प्रेमीयुगूल दिसले.

थोडं पुढे आल्यावर नुकतेच लग्न झालेले एक जोडपेही एकमेकांचा हात धरुन लोकलमध्ये चढताना दिसले. एरवी असे सगळे आपल्या आजुबाजूला सुरु असले तरीही त्याकडे लक्ष जात नाही. आज मात्र या सगळ्या गोष्टी मुद्दामहून अंगावर येताहेत असंच तिला वाटत होतं. आपल्याला डिवचण्यासाठी हे सगळं घडतंय की काय असाच काहीसा विचार करत ती घरापर्यंत पोहोचलीदेखील.

(क्रमश:)
– तीन फुल्या, तीन बदाम