काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष संदीप सावंत यांना झालेली मारहाण हे शिवसेनेचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी सोमवारी चिपळूणमध्ये केला. ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांनी मिळून हे षडयंत्र रचले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संदीप सावंत यांना कसलीच मारहाण झालेली नाही, असाही दावा त्यांनी केला.
माजी खासदार नीलेश राणे, त्यांचा स्वीय सहायक तुषार व अंगरक्षकाने संदीप सावंत यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. या हल्ल्यात संदीप हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रत्नागिरी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करून तो चिपळूण पोलीस ठाण्यात वर्ग केला. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे सोमवारी चिपळूणमध्ये आले होते.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, संदीप सावंत यांची रुग्णालयात जाऊन मी भेट घेतली होती. त्यांच्या अंगावर कुठेही मारहाणीच्या खुणा दिसत नाहीत. त्यांना मुंबईत मारहाण झाल्याचा दावा करण्यात येतो आहे. मग त्यांनी ठाण्यामध्ये जाऊन का तक्रार दिली. हे संपूर्ण प्रकरण खोट्या माहितीवर आधारित असून, आपल्या विरोधकांनी रचलेले आहे, असा दावा त्यांनी केला.