देशभरात एकीकडे करोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत असताना, दुसरीकडे लसींचा तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेस ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. तसेच, अनेक रूग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसून, रूग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच, या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकाने रेमडेसीवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मी रेमडीसीवीर उत्पादकांची बैठक घेतली होती.त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्दयावर चर्चा करण्यात आली होती. आज केंद्र शासनाने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.” असं राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय!; ‘रेमडेसीवर’ची निर्यात थांबवली

जो पर्यंत देशात करोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत रेमडेसीवीरच्या निर्यातीवरती पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसीवीरचं उत्पादन करतात त्यांना, त्यांच्या वेबसाईटवरती संपूर्ण साठ्याची माहिती देखील टाकावी लागणार आहे. कोणत्या वितरकरांच्या माध्यमातून त्या पुरवठा करत आहेत, याबाबत देखील माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसीवरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत, हे देखील जाहीर करावं लागणार आहे.

रेमडेसिवीरचा देशात तुटवडा आणि भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप

तसेच, राज्यात रेमडेसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.

रेमडेसीवीरसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष

राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्यासाठी नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हास्तरावर रेमडेसीवीरचा जिल्हास्तरावर पुरवठा सुरळीत होण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते.