लॉकडाउन संपवण्याचा काळ जवळ येत असताना दुसरीकडं करोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारकडं केली आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका वाढल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ही भूमिका राज्यांनी घेतली आहे. या मागणीचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी समर्थन केलं आहे.

लॉकडाउन लागू केल्यानंतर देशातील विविध राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुठलाही परदेशी प्रवास न केलेल्या नागरिकांनाही करोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्यानं कम्युनिटी ट्रान्समिशनचं संकट घोंगावू लागलं आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात अनेक राज्य विचार करत आहेत. यासंदर्भात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले,”लोकांचं जीव जास्त महत्त्वाचे आहेत. अर्थव्यवस्था पुन्हा उभी करता येऊ शकते. पण, लोकांचे जीव गेले तर ते परत कसे आणणार? त्यामुळे जर लॉकडाउन वाढवण्याची गरज पडली तर परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ,” असं मुख्यमंत्री चौहान म्हणाले.

आणखी वाचा- लॉकडाउन : अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम; ५२ टक्के नोकऱ्यांवर टांगती तलवार ?

करोनामुळे मध्य प्रदेशातील परिस्थितीही चिंताजनक वळणार आहे. मंगळवारी १२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा २७५ झाला आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे भोपाळमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची घटना समोर आल्या आहेत.