हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सरकारचे शेतकरी धोरण यासाठी देशातील सुमारे १८० शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत एकत्र आल्या असून रामलीला मैदान ते संसदेपर्यंत किसान मुक्ती संसदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि या मोर्चोचे संयोजक खासदार राजू शेट्टी यांनी दिली. किमान समान कार्यक्रमावर या संघटना एकत्र आल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्षे झाले. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ असे म्हटले होते. भाव तर दिला नाही, पण नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले. त्याच्यावरही या सरकारने  काहीच केले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, असेही शेट्टी म्हणाले. आम्ही शेती केली ती आमची चूक आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

LIVE UPDATES:

– हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित

– हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

– देशातील सर्व शेतकरी संघटना पहिल्यांदा एकत्रित

– आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या हातात झेंडे, विविध घोषणांचे फलक

– रामलीला मैदानावरून मोर्चास प्रारंभ

– विविध राज्यातील शेतकरी नेत्यांचा आंदोलनात सहभाग

– महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचाही आंदोलनात सहभाग

– मेधा पाटकरही मोर्चात सहभागी

– मोर्चात केंद्र सरकारच्या शेतीविरोधातील धोरणाचा निषेध केला जाणार

– रामलीला मैदानावरून हा मोर्चा संसदेपर्यंत जाईल.

– रामलीला मैदानावर शेतकरी व विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने जमा होत आहेत.