जे झाले ते झाले, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता पाच वष्रे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली.

दानवे यांनी मतदार संघनिहाय मोजक्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भाजपने जिल्ह्यत स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर नऊपकी आठ जागा जिंकल्या असत्या; परंतु युती केल्यामुळे भाजपचे नुकसान झाले व पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे लक्ष न दिल्यामुळे मृतप्राय झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली, असे स्पष्ट मत व्यक्त केले. या वेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असा नारा दिला तर काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा शिवसेनेशी समझोता करा, असाही सूर आळवला.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चांगली संधी भाजपकडे होती; परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात, त्यामुळे दगाफटकाही झाला. आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. यामध्ये बदल होईल किंवा नाही हे सांगता येत नाही; परंतु २०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगली ताकदवान माणसे पक्षात आणा. तुमच्या मनातील भावना माहिती आहेत. पुढे युती होणार नाही, असे संकेतही दानवे यांनी या वेळी दिले. राज्यातील राजकीय घडामोडींवर पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवून आहेत. केंद्राच्या हाती राज्याचा कारभार आहे, असे म्हणत दानवे यांनी सरकार कोणाचे बनेल, याबद्दल बोलणे मात्र टाळले.

या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, तुषार राठोड, माजी मंत्री डॉ. माधव किन्हाळकर, बापूसाहेब गोरठेकर, डॉ. धनाजीराव देशमुख, गंगाराम ठक्करवाड, गंगाधर जोशी, महानगराध्यक्ष प्रवीण साले, अ‍ॅड. चतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शिवसेनेकडून जनमताचा अनादर

तीन पक्ष एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रम म्हणत सरकार स्थापनेचा विचार करत आहेत; पण यातील दोन पक्ष विरुद्ध टोकाचे आहेत. सरकार बनवणे इतके सोपे नाही. शिवसेनेने जनमताचा आदर करावा, जनमताचा आदर न करणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला.  सत्तास्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला होता; परंतु त्यांनी तो उचलला नाही. मुख्यमंत्रिपदाचा एकच हट्ट ते धरून बसले आहेत. मुख्यमंत्रिपदासाठीचा कोणताही शब्द त्यांना भाजपकडून देण्यात आला नव्हता, असा दावा दानवे यांनी केला.