राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता राजकारणाला ऊत आला आहे. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांना निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य चालवता येत नाही अशी, बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे केली. उठसूठ केंद्राकडे मदतीचा हात पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चिपळूणमध्ये झालेल्या पत्रकार परिषेदत केंद्र सरकारकडून चक्रीवादळात जाहीर केलेली मदत पोहोचली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलं. तसेच राज्य चालवायला आमच्या हाती द्या, आम्ही वेटिंगवर बसलो आहोत, असंही सांगितलं.

“राज्य कशाला आहे? केंद्राला देऊन टाका ना ताब्यात चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय. केंद्र सातत्याने मदत करत आहे. मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली. आज ते विनम्र झाले”, असं बोलताच त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं आणि जोरात हसले.

“करोना, वादळं, पाऊस उद्धव ठाकरेंचाच पायगुण”; नारायण राणेंचा जोरदार हल्लोबाल

“पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.”, असा निशाणाही त्यांनी साधला.