इंडोनेशियात पार प़डलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या अॅथलिट्सनी यंदा बहारदार कामगिरी केली. गोळाफेकीमध्ये भारताच्या तेजिंदरपाल सिंह तूरने मातब्बर खेळाडूंची झुंज मोडून काढत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. स्पर्धेदरम्यान तेजिंदरचे वडील हे कॅन्सरमुळे आजारी होते. भारतात परत आल्यानंतर आपण कमावलेलं पदक बाबांच्या गळ्यात घालण्याची इच्छा तेजिंदरने बोलून दाखवली होती. भारतात आगमन झाल्यानंतर सहकाऱ्यांनी जंगी मिरवणूक काढत तेजिंदरचं स्वागत केलं. मात्र कॅन्सरमुळे आजारी असलेले आपले वडील करम सिंह यांचं निधन झाल्याची बातमी तेजिंदरला समजली आणि क्षणार्धात तेजिंदरच्या सुवर्णपदकाच्या आनंदाचं दु:खात रुपांतर झालं.

“भारतात परत येत असताना हे सुवर्णपदक बाबांच्या गळ्यात घालेन असं मनोमन ठरवलं होतं. मात्र आता ते काही होणार नाहीये. मी मिळवलेल्या पदकामागे बाबांचेही अनेक कष्ट आहेत.” तेजिंदरपालने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांच्या आणि सुवर्णपदकापर्यंतच्या प्रवासाच्या अनेक आठवणी सांगितल्या. तेजिंदर जकार्तामध्ये मैदानात खेळत असताना, त्याच्या वडिलांची तब्येत खालावली होती. मात्र अशाही परिस्थितीमध्ये त्यांना आपल्या मुलाचा खेळ पहायचा होता. हॉस्पिटलमध्ये असताना, त्यांनी तेजिंदरला टीव्हीवर पाहता यावं यासाठी बे़ड थो़डा उंच करण्यासाठी सांगितलं. भारतात परतल्यानंतर तेजिंदरच्या सत्कार सोहळ्याला हजर राहण्याचीही त्यांची प्रचंड इच्छा होती. तेजिंदरचे काका हरदेव सिंह बोलत होते.

२०१३ पर्यंत आपला परिवार हा फक्त शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून होता. याच वर्षात बाबांना कॅन्सरची लागण झाल्याचं समजलं. २०१५ साली मला राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक मिळालं, यानंतर पंजाब सरकारने मला फक्त २० हजारांची मदत केली. या रकमेतला बहुतांश भाग हा बाबांच्या उपचारांवर खर्च झाला. २०१६ साली मी भारतीय नौदलाकडून आलेली नोकरीची संधी स्विकारल्यानंतर बाबांच्या वैद्यकीय खर्चाची काही प्रमाणात सोय झाली. तेजिंदरपालने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. सुवर्णपदक जिंकलो याचा आनंद कायम राहिलं मात्र हे पदक बाबांच्या गळ्यात घालायचं होतं, ती संधी मात्र मिळालीच नसल्याची खंत तेजिंदरने व्यक्त केली.