निश्चलनीकरणामुळे पुस्तकविक्रीत निम्म्याहून अधिक घट; प्रदर्शने थंडावली, वर्षभराचे वेळापत्रक बिघडले

निश्चलनीकणाचा साऱ्याच व्यवसायांना टक्क्यांच्या हिशेबात कमी-अधिक प्रमाणात फटका बसत असला, तरी सध्या मराठी साहित्य व्यवहार भीषण आर्थिक चरक्यात सापडला आहे. खरेदी-विक्रीच्या ऐन हंगामात नोटाबंदीचा निर्णय झाल्याने राज्यातील साऱ्याच पुस्तकांच्या दुकानांमध्ये ग्राहकटंचाई दिसत आहे. नव्या पुस्तकांची निर्मिती आणि विक्री पूर्णपणे थंडावली आहे. पुढील काही महिन्यांत यात सुधारणा न झाल्यास मराठी ग्रंथव्यवहाराला कधी नव्हे इतक्या मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार

पुस्तकखरेदी ही अत्यावश्यक बाब नसली, तरी साहित्यप्रेमींमुळे ती कधी रोडावत नाही. नोटाबंदीनंतर मात्र देशभरातील नागरिकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. बँका, एटीएम रांगांत वेळ खर्च करून हाती पडणारे स्वहक्काचे तुटपुंजे पैसे मूलभूत गोष्टींसाठी कमी पडत आहेत. त्यामुळे साहित्य वाचून हा व्यवसाय तगविणाऱ्या पुस्तकवेडय़ांसोबत भेटवस्तू म्हणून पुस्तक देणाऱ्या लोकांनीही ग्रंथदुकानांकडे पाठ फिरविलेली आहे. पुस्तकांची विक्री चाळीस ते पन्नास टक्क्य़ांनी थंडावल्याचे ग्रंथविक्रेते सांगत असले, तरी हा आकडा त्याहून अधिक असल्याचे चित्र सर्व पुस्तकालयांकडे पाहिल्यानंतर दिसते आहे.

हंगाम कोरडा

दिवाळी झाली की पुस्तक खरेदीचा हंगाम सुरू होतो तो मार्चपर्यंत असतो. याच कालावधीत पुस्तक प्रदर्शनेही मोठय़ा प्रमाणात होत असतात. या वर्षी दिवाळीअंकांची विक्री चलनगोंधळातून कशीबशी तरली. पण नोटाबंदीनिर्णयानंतर झालेल्या गोंधळात पैसे वाचवण्याकडे ग्राहकांचा कल अधिक असल्यामुळे पुस्तकांना मागणी नाही. गेल्या महिन्यापासून राज्यभरातील पुस्तक प्रदर्शने ओस पडली आहेत. प्रदर्शनांसाठी केलेली गुंतवणूक सुटेल का याचीही चिंता पुस्तक प्रदर्शने आयोजित करणाऱ्या संस्थांना पडली आहे.

खरेदीचा कल बदलला

विक्रेत्यांकडे पुस्तकांची खरेदी करण्यासाठी पुरेसे चलन नाही. ऑनलाइन पुस्तक खरेदीची मानसिकताही अद्याप पूर्णपणे रुजलेली नाही. शिवाय कार्ड किंवा पेटीएमनेही पुस्तकखरेदीला म्हणावा तितका प्रतिसाद राहिलेला नाही.

पुस्तक प्रकल्प रखडले

सध्याच्या तोटय़ामुळे रोजच्या व्यवहारातील खर्च भागवणेही प्रकाशकांसाठी अवघड झाले आहे. अनेक बडय़ा प्रकाशकांचे दीड ते दोन वर्षांचे वेळापत्रक कोलमडले असून, हाती असलेले पुस्तकप्रकल्प ३ ते ४ महिने पुढे ढकलण्यात आले आहेत. सध्याची चलनपरिस्थिती अशीच राहिल्यास नुकसान आणखी वाढेल. ती तूट भरून येण्यास जवळपास वर्षभराचा कालावधी लागेल.

यापूर्वी आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेतही प्रकाशन व्यवसायावर परिणाम झाला नव्हता. सध्या मात्र एका महिन्यात व्यवसाय थंडावला आहे. प्रदर्शनांचे खर्च भागवणेही आयोजकांना कठीण होते आहे. हंगामात प्रदर्शनांमध्ये दिवसाला ६० ते ७० हजार पुस्तकांची विक्री रोज होत असे. आता ती निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. हातातील प्रकल्प थांबले आहेत. आठवडय़ाला दोन पुस्तकांच्या जागी आता महिन्याला दोन पुस्तके प्रकाशित करीत आहोत. दत्तात्रय पाष्टे, डायमंड प्रकाशन

राजहंसकडे २०१८ पर्यंतच्या प्रकल्पांचे वेळापत्रक ठरले होते. त्यानुसार कामही सुरू होते. सध्या नोटाबंदीमुळे पुस्तक खरेदी थंडावली आहे. विक्रीत ३० ते ४० टक्क्य़ांची घट झाली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. याचा परिणाम पुढील दीड ते दोन वर्षांच्या वेळापत्रकावर होणार आहे.  डॉ. सदानंद बोरसे, राजहंस प्रकाशन

किरकोळ विक्री कमी झाली आहे. सगळ्याच छोटय़ा दुकानांमध्ये स्वाइप मशिन्सची सुविधा नसते. अशा दुकानांमध्ये विक्री थंडावली आहे. त्यामुळे त्याचा प्रकाशन व्यवसायावर परिणाम झाला आहे. सगळी परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल.  अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन

निश्चलनीकरणाचा पुस्तकांच्या विक्रीवर निश्चितच परिणाम झाला आहे. जवळपास पन्नास टक्क्यांनी विक्री कमी झाली आहे. आमची अनेक पुस्तके ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत बाजारात आली. त्याच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. अद्याप पुढील नियोजन बदललेले नाही. काही दिवसांनी परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.  रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशन