मालेगाव शहरात करोनाविरोधात यशस्वी झालेल्या युनानी काढय़ाचा उपयोग धुळे शहरातही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे करोना विरुध्द लढणाऱ्या योद्धय़ांना हा काढा देण्यात येईल. शिवाय, मनपाच्या वतीने हा काढा तयार करुन शहरात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पालिका आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मालेगाव येथील खातून एज्युकेशन सोयसायटीचे अल अमीन युनानी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, आर. एम. एम. इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने धुळे जिल्हा न्यायालयातील कर्मचारी आणि माध्यमांसाठी युनानी काढा वाटप कार्यक्रम झाला. यावेळी आयुक्तांनी पालिकेची युनानी काढा वाटपासाठी तयारी असल्याचे सांगितले. यावेळी युनानी महाविद्यालयाचे अध्यक्ष रिजवान शेख यांनी शहरातील संस्था, व्यक्ती, प्रशासकीय यंत्रणेकडून मागणी झाल्यास हा काढा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले. भारतीय चिकित्सा पध्दती, घरगुती आयुर्वेद पध्दती शेकडो वर्षांंची आहे. ही चिकित्सा पध्दती रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे प्राचार्य टी. ए. देशमुख यांनी सांगितले.

या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. ए. एच. सय्यद उपस्थित होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. जी. यु. डोंगरे, महापालिका आयुक्त अजीज शेख, प्राचार्य डॉ.सलीम शहा आदी उपस्थित होते. न्या. सय्यद यांनी करोनाविरूध्द रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या उपाय योजना फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी देखील शारीरिक अंतर, मुखपट्टीचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरपूरमध्ये १८८ अहवाल नकारात्मक

करोना रूग्णवाढीमुळे हैराण झालेल्या शिरपूर शहर आणि तालुक्यासाठी गुरूवार दुपापर्यंत सुखद गेला. उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या १८८ संशयितांच्या स्त्राव तपासणीचे अहवाल नकारात्मक आले आहेत. एकही नवीन रूग्ण न आढळल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या दुपापर्यंत ११५२ एवढी झाली आहे. धुळे शहरात रूग्णांची संख्या ५६० वर पोहचली आहे. शहरात सुरुवातीला दाट वस्तीत रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मात्र शहरातील सर्वच भागात करोना रुग्ण आढळून आले. रुग्ण आढळल्यानंतर तो भाग इतरांसाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे. शहरात सध्या १३३ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. त्या क्षेत्रात साधारणपणे १८० कॉलन्यांचा समावेश आहे. १४ दिवसांच्या आत नवीन रुग्ण न आढळल्यास ते क्षेत्र पुन्हा मुक्त करण्यात येते. आजपर्यंत ३३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण चांगले आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.