कर्जाला कंटाळून शहरातील बबन नाथा चितळे (वय ५८) या शेतकऱ्याने रविवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेतातील झाडाला चितळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेवगाव रस्त्यावरील छत्रपती चौकालगत ते राहात होते. त्यांना पाच एकर शेती होती, मात्र गेल्या पाच वर्षांत पावसाअभावी त्यांना एकही पीक साधले नाही. शेतात विहीर आहे, मात्र तीही कोरडी पडली आहे. त्यांना चार मुली आहेत. चौघींची लग्ने झाली असून यातील एक विधवा आहे. तिचा सांभाळही चितळे हेच करीत होते. सेवा सोसायटीचे ३७ हजार रुपयांचे कर्ज त्यांना होते. शिवाय खासगी सावकारांकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. हे पैसे फेडण्याचीच चिंता त्यांना होती. शेतात काम नसल्यामुळे ते गवंडय़ाच्या हाताखाली मजुरीचे काम करीत होते. तरीही पैसे फेडणे शक्य नसल्याने अखेर त्यांनी रविवारी मध्यरात्री आत्महत्या केली. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
चितळे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सोमवारी दुपारी तहसीलदार सुनीता जऱ्हाड यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.