विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना खेळतो आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आफ्रिका दौऱ्यानंतर बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. २४ ऑक्टोबरला बीसीसीआयची निवड समिती भारताच्या टी-२० आणि कसोटी संघाची निवड करणार आहे. बांगलादेशविरुद्ध भारत ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

बांगलादेशविरुद्ध मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता विराटवर क्रिकेटचा अतिताण येऊ नये यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. निवड समितीमधील सुत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी निवड समिती विराटशी चर्चा करेल असंही सुत्रांनी स्पष्ट केली. ३ नोव्हेंबरपासून भारत बांगलादेशविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे.