जातीचं राजकारण मला दिल्लीत कळालं महाराष्ट्रात नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी राजकीय पक्ष आणि जात या प्रश्नावर उत्तर देताना आपलं मत व्यक्त केलं.

“ज्या राज्यात मी लहानाची मोठी झाली तिथे अशी परिस्थिती कधीच नव्हती. मला खरं तर जातीचं राजकारण मला महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत कळलं. मला तिथे खासदार तुम्ही ठाकूर, गुज्जर असल्याचं विचारायचे. मी याबद्दल शरद पवारांनाही विचारलं. त्यावर तू काम कर, निवडून आली आहेस ना मग राज्याचे प्रश्न बघ असं सांगायचे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

“….त्या दिवशी तुला संसदेची पायरी चढता येणार नाही”, शरद पवार असं का म्हणाले होते? सुप्रिया सुळेंनी सांगितलं कारण

“मी त्या काळात गांभीर्याने घेतलं नव्हतं. पण समाजात अनेकांच्या मनात या गोष्टी रुजल्या आहेत. शिक्षणातून या सगळ्या गोष्टी जातात असं मला वाटायचं,” असंही त्या म्हणाल्या. जातीची ओळख असावी त्यात काही गैर नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

तू राजकारणाच्या फंद्यात पडू नकोस असं कधी आई-वडिलांनी सांगितलं का?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

“आपण सगळे साक्षर आहोत पण शिकलेलो आहोत का? साक्षर आणि शिक्षणात फार अंतर आहे. चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं असेल तर राज्यात घरगुती हिंसाचार होईल का? सुशिक्षित कुटुंब असेल तर मुलगा व्हावा हा प्रश्नच कुठे येतो. यावर मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर बदल दिसेल,” असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटलं होतं का?; सुप्रिया सुळे म्हणतात…

“जातीची माहिती, एक वेगळी ओळख असणं यात गैर नाही. पण राजकीय घटक शोषण करुन जर त्या राज्यात समतोल बिघडवत असेल तर चिंताजनक आहे. वाढणारी कटुता कोणत्याही राज्य, देश आणि प्रगतीसाठी घातक आहे,” असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं आहे.