लोकसभा निवडणुकी अगोदर भाजपाच्या कार्यशैलीवर टीक करत पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची प्रशंसा केली आहे.

विशेष म्हणजे या अगोदर शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या प्रत्येक धोरणावर टीका करण्यात आलेली आहे. मात्र, आता त्यांनी पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट रोजी देशाला उद्देशून केलेले भाषण आवडलं असल्याचे सांगत, त्यांनी मोदींचे हे भाषण धाडसी, तथ्य मांडणारे आणि विचारप्रवृत्त करणारे होते असे म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, माझ्या वक्तव्यांमुळे मी सदैव चर्चेत राहतही असेल, मात्र १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण खूपच धाडसी आणि विचारप्रवृत्त करणारे होते, यात देशासमोरील समस्या खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या गेल्या हे मला मान्य करावे लागेल.
शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोदींच्या भाषणाची प्रशंसा करणारे शत्रुघ्न सिन्हा एकमेव काँग्रेस नेते नाहीत, या अगोदर पी.चिदंबरम यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या भाषणाची प्रशंसा केलेली आहे.