‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी परीक्षेदेखील कॉपी करुन पास झाले असतील’, असं म्हणत चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. संरक्षणासंदर्भात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकींना राहुल गांधी गैरहजर होते, अशी माहिती समोर आली. त्या माहितीचा हवाला देत अशोक पंडित यांनी ट्विट करुन राहुल गांधींवर टीका केली आहे.

“मला पूर्ण खात्री आहे राहुल गांधी यांनी परीक्षेतही पास होण्यासाठी कॉपी केली असणार म्हणूनच, ते पास झाले आहेत. वर्ग कोणताही असो ते सतत वर्गात गैरहजर राहत असणार. तसंच त्यांनी संरक्षणासंदर्भात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकींमध्येही कधी सहभाग घेतला नाही आणि आता त्याविषयी भाष्य करत आहेत”, असं अशोक पंडित म्हणाले. अशोक पंडित यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर या ट्विटविषयी प्रचंड चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अशोक पंडित यांचं ट्विट पाहिल्यांनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांची पाठराखणदेखील केली आहे.एकीकडे चीन-भारत सीमा संघर्ष अजूनही संपलेला नसताना देशात गलवान व्हॅलीतील संघर्षावरून भाजपा विरूद्ध काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातच सीमेवरील संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. मात्र असं असलं तरीदेखील ते डिफेन्सशी संबंधित बैठकीत गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी सध्या सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं आहे.