बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्याविषयी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या कलाकाराची नेहमीच चर्चा रंगते. तशीच चर्चा गेल्या काही दिवसापासून शाहिद कपूरविषयी रंगताना दिसत आहे. ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेला गेलेला शाहिद पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. याविषयी शाहिदच्या पत्नीने मीरानेच खुलासा केला आहे.

येत्या काळामध्ये शाहिद पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शाहिद त्याच्या पत्नी मीरा राजपूतसोबतच पुन्हा एकदा लग्न करणार आहे. लग्नाच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचं मीराने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

विवाहसोहळ्याचे सगळे क्षण पुन्हा एकदा अनुभवता यावेत. नात्याची नवी बाजू पुन्हा एकदा नव्याने उलगडली जावी यासाठी या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर पुन्हा एकदा मीरासोबत लग्न करणार असं वचनही शाहिदने मीराला दिलं आहे, असं मीराने सांगितलं. या दोघांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना मिशा आणि झेन ही दोन मुलं आहेत.

दरम्यान, ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे शाहिद विशेष प्रकाशझोतात आला असून हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे. चित्रपटामध्ये शाहिदनं साकारलेली ‘कबीर सिंह’ ही भूमिका आक्रमक, लाऊड आणि स्ट्रॉन्ग दाखवण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर शाहिदची लोकप्रियता वाढली असून त्याने त्याच्या मानधनातही वाढ केल्याचं सांगण्यात येत आहे.