देशातील काही राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर या प्रकरणातील तेजीमुळे केंद्र आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशभरात असे १८ जिल्हे आहेत, जिथे कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. यापैकी १० जिल्हे केवळ केरळमधील आहेत. तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ५७ जिल्ह्यांमध्ये दररोज १०० रुग्ण आढळत आहेत. तसेच देशातील १८  जिल्ह्यांमध्ये करोनाची सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामध्ये केरळमधील १०, महाराष्ट्रातील ३, मणिपूरमधील २, अरुणाचल, मेघालय आणि मिझोरामच्या १-१ जिल्ह्यांचा समावेश आहे.

तसेच देशात ४४ जिल्हे असे आहेत जेथे १०% पेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी दर आहे. हे ४४ जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, पुद्दुचेरी, राजस्थान, हिमाचल प्रदेश, आसाम आणि आंध्र प्रदेशातील आहेत.

देशात करोनाच्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत आढळले ३०,५४९ रुग्ण 

दुसरी लाट अजून संपलेली नाही

लव अग्रवाल म्हणाले की, जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत. जोपर्यंत भारताचा प्रश्न आहे, दुसरी लाट अजून संपलेली नाही. देशात आतापर्यंत ४७.८५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी ३७.२६ कोटी जणांना पहिला डोस मिळाला आहे आणि १०.५९ कोटी जणांना दोन्ही मिळाले आहेत. मे महिन्यात १९.६. लाख डोस आणि जुलैमध्ये ४३.४१ लाख डोस देण्यात आले आहेत. म्हणजेच, मे महिन्यात ज्यांना लसीचा डोस देण्यात आला त्यांच्या तुलनेत ही संख्या जुलैमध्ये दुप्पट आहे.