Asian Games 2018 : इंडोनेशिया येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज स्पर्धेच्या आठव्या दिवशी ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली. तिने ५०. ७९ सेकंदात शर्यत पार केली. तर दुसरीकडे ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पुरुष गटात भारताच्या मोहम्मद अनासनेही रौप्यपदकाची कमाई केली. अनासने ४५.४९ सेकंदात शर्यत पार केली. या बरोबर भारताने आतापर्यंत दिवसात ५ रौप्यपदकांची कमाई केली आहे. द्युतीचंदला २ सेकंदाच्या फरकाने सुवर्णपदकाला मुकावे लागले. या आधी भारताने 'इक्वेस्ट्रीयन' या घोडेस्वारीच्या प्रकारात दोन रौप्यपदके पटकावली. घोडेस्वार फौवादचे मिर्झा याला वैयक्तिक प्रकारात हे यश संपादन केले. भारताला ३६ वर्षांनंतर 'इक्वेस्ट्रीयन' प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. याशिवाय सांघिक प्रकारातही भारताने 'इक्वेस्ट्रीयन जम्पिंग'मध्येही रौप्यपदक मिळवले. त्यानंतर भारताच्या सायना नेहवालने थायलंडच्या रात्चनोक इंटानोन हिच्यावर २१-१८, २१-१६ अशी मात केली. त्यामुळे सायना पदकाच्या शर्यतीत दाखल असून भारताचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. सायनापाठोपाठ भारताच्या सिंधूने थायलंडच्या जिंदापॉलवर २१-११, १६-२१, २१-१४ अशी मात केली. त्यामुळे सिंधूही पदकाच्या शर्यतीत दाखल झाली असून भारताला २ पदकांची कमाई करता येऊ शकते. यामुळे या स्पर्धेच्या बॅडमिंटन क्रिडाप्रकारातील ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपणार आहे. तसेच, भारतीय नेमबाजांचीही पदके निश्चित आहेत. श्रीशंकरदेखील लांबउडी प्रकारातील अंतिम फेरीत सहभागी होणार आहे.