पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं पॅकेज २० लाख कोटींचं नसून केवळ ३.२२ लाख कोटींचं आहे, असा दावा काँग्रेसनं केला आहे. ही आकडेवारी खोडून काढण्याचं चॅलेंज मी त्यांना देतोय, असा थेट हल्ला काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेनंतर आनंद शर्मा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. “मोदी सरकारचा २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा खोटी आहे. खरं पॅकेज केवळ ३.२२ लाख कोटींची आहे. हा आकडा जीडीपीच्या केवळ १.६ टक्केच आहे,” असा दावाही आनंद शर्मा यांनी यावेळी केला.

“माझं केंद्रीय अर्थमंत्र्यांना, मोदी सरकारला थेट आव्हान आहे, की त्यांनी मी दिलेली आकडेवारी खोडून दाखवावी. त्यांच्यासोबत खुली चर्चा करण्याची माझी कधीही तयारी आहे,” असा हल्लाबोलही काँग्रेस प्रवक्ते शर्मा यांनी केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ बोलू नये, काही करूनही दाखवावं,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

निर्मला सीतारामन यांनी केला होता काँग्रेसवर हल्ला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचं नाव येताच निर्मला सीतारामन भडकल्या. “मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की, त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे,” असं यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

सीतारामन यांनी सांगितलं की, “मला विरोधी पक्षांना आवाहन करायचं आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे”.