लॉकडाउनमध्ये लोकांना ‘रामायण’ व ‘महाभारत’ या गाजलेल्या पौराणिक मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. या दोन्ही मालिका व त्यातील कलाकारांची आजही स्तुती होते. बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिका पुन्हा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचसोबत एकता कपूरच्या ‘महाभारत’ मालिकेवर संताप व्यक्त केला.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले, “एकता कपूरने तिच्या मालिकेत रोनित रॉयला भीष्म पितामह यांच्या भूमिकेसाठी निवडलं. नव्या महाभारत मालिकेतील कलाकार सिक्स-पॅक अॅब्स दाखवत होते, द्रौपती आणि इतर स्त्री पात्रांसाठी प्रसिद्ध अभिनेत्रींना निवडलं गेलं. भीष्म पितामह यांची भूमिका साकारण्यापूर्वी मी १५ चित्रपटांत काम केलं होतं. त्यावेळी मी भूमिकेसाठी लूक टेस्ट दिला होता. ऑडिशनद्वारे आम्हाला निवडलं गेलं होतं. मात्र एकता कपूरने नव्या मालिकेचा सत्यानाश केला होता.”

एकता कपूरने मुकेश खन्ना यांना ‘महाभारत’ मालिकेतील भूमिकेसाठी विचारलं होतं, असाही खुलासा त्यांनी केला. मात्र ती भूमिका त्यांनी नाकारली. “भीष्म पितामह यांचे वडील शांतनूंच्या भूमिकेची ऑफर मला दिली होती. मात्र भीष्म पितामह साकारल्यानंतर मी त्यांच्या वडिलांची भूमिका साकारेन असं तुम्हाला वाटतं का, अशा शब्दांत मी त्यांना सुनावलं. एकता कपूरने महाभारताची चेष्टा केली. डेली सोपच्या कलाकारांना तिने पौराणिक मालिकेसाठी निवडलं”, अशा शब्दांत त्यांनी एकता कपूरवर टीका केली.