नुकताच विविध राज्यातील दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. तर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुणही मिळाले. पण बिहारमधील बारावी बोर्डाच्या परीक्षेत एक अजब प्रकार घडला.

बिहारच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरमध्ये एका विद्यार्थ्याला चक्क ३५ पैकी ३८ गुण देण्यात आले. गणिताच्या पेपरमध्ये थेअरी प्रश्न हे ३५ गुणांसाठी विचारण्यात आले होते. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही ३५ गुणांसाठी विचारण्यात आले होते. या पेपरमध्ये बिहारच्या अरवाल भागातील भीम कुमार या विद्यार्थ्याला थेअरी प्रश्नांमध्ये चक्क ३५ पैकी ३८ गुण देण्यात आले आहेत. हि गोष्ट येथेच थांबली नसून याच विद्यार्थ्याला त्याच पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये ३५ पैकी ३७ गुण देण्यात आले आहेत.

याशिवाय, वैशाली जिल्ह्यातील एका विद्यार्थीनीलाही असाच पण थोडा वेगळ्या प्रकारचा अनुभव आला. त्या विद्यार्थिनीला जीवशास्त्र या विषयात १८ गुण देण्यात आले. मात्र ती विद्यार्थिनी या परीक्षेला बसलीच नसल्याचे तिने सांगितले.

दरम्यान, या सावळ्यागोंधळाबाबत विचारले असता विद्यार्थी अजिबात अचंबित नसल्याचे दिसून आले. असे प्रकार सवयींचेच असल्याचेही काहींनी सांगितले.