ठाकरे सरकारने करोना रुग्णसंख्या कमी झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करत जनतेला दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. लोकल सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने एकीकडे लोक नाराजी व्यक्त करत असताना दुसरीकडे विरोधकही टीका करत आहेत. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई लोकलसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे.

लोकलबाबत राज्य सरकारने लोकांच्या मागण्यांचा विचार करावा. राज्य सरकार तयारी दाखवेल त्याक्षणी लोकलला परवानगी द्यायला तयार असल्याचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Mumbai local : रेल्वे मंत्रिपदाची सूत्रं स्वीकारताच मुंबईतील लोकलबद्दल रावसाहेब दानवे यांची महत्त्वाची घोषणा

“राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य करोना स्थिती हाताळत आहे,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; हायकोर्टाची सूचना

लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा अशी सूचना हायकोर्टाने ठाकरे सरकारला केली आहे. हायकोर्टात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली. दरम्यान आज पुन्हा सुनावणी होणार असून यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी निर्णय़ होण्याची शक्यता आहे.