” जिथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असतो, तिथे आपण खोटं बोलू शकत नाही”, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री पदावरूनही सूचक वक्तव्य केले आहे. ते शुक्रवारी चाकण येथे सुरेश गोरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी वचननाम्यातील योजना वाचून दाखवताना म्हटले की, वचननाम्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. जिथं त्यांचा फोटो असतो, तिथं आपण खोटं बोलू शकत नाही. वचननाम्यातील प्रत्येक योजना राबवायला पाठबळ लागेल. महाराष्ट्र एकटा घडवू शकत नाही, समोर बसलेली जनता नवा महाराष्ट्र घडवू शकते.

त्यांनी पुढे म्हटलं की, एक स्वप्न घेऊन निवडणूक लढवत आहे, कोणी सांगेल का माझं स्वप्न काय आहे? तेव्हा उपस्थितातील एकजणाने सांगितेल मुख्यमंत्री तर दुसऱ्या एकाने नवा महाराष्ट्र घडवायचा तुमचं स्वप्न आहे असं म्हटले. यावर आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य करत, दादा तुम्ही जे बोललात ते माझ्या हातात नाही, ते तुमच्या हातात असतं. माझ्या हातात एवढंच आहे की, जी जबाबदारी मिळेल त्यातून नवा महाराष्ट्र घडवायचा. बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे. म्हणून मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे असही ते म्हणाले.

जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस विचारतात की पुढचा नवा महाराष्ट्र कसा असेल? तेव्हा, मी त्यांना सांगतो की, या आमच्या सोबत एकत्र काम करा. मतदान भाजपा-शिवसेनेला करा. तुम्हालाही नवा महाराष्ट्र कसा आहे दाखवतो. पंधरा वर्षात यांची सत्ता होती, तेव्हा मजामस्ती केली. आता यांच्या पोटात दुखत आहे की, दहा रुपयांत जेवण देणार तरी कस? आम्ही करणार आहोत, तुमच्या पोटात का दुखतं? तुम्ही तर करू नाही शकलात, तुम्हाला लोकांनी नाकारलं आहे. त्यामुळं जनतेने ठरवलेले आहे की, निकम्मे ‘हात’ आणि बंद पडलेली ‘घड्याळ’ घ्यायची नाही, असा टोला देखील त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला लगावला. यावेळी त्यांनी अपक्षांना देखील नाकारायचे आहे, असे देखील मतदारांना आवाहन केले.