राज्यातील करोनाती दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दररोजा आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत सातत्याने करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. परिणामी राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये वाढ सुरू आहे. राज्य सरकारकडून अनलॉक प्रक्रिया सुरू केली गेली असून, करोना निर्बंध शिथिल केले जात आहेत. दरम्यान, मागील २४ तासांमध्ये राज्यभरात १४ हजार ३४७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ९ हजार ७९८ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १९८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५६,९९,९८३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९०,७८,५४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,५४,५०८ (१५.२४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,५४,४६१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,८३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच, राज्यात आज रोजी एकूण १,३४,७४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Maharashtra Unlock : मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मोठी घट; निर्बंध होणार शिथिल?

दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.