स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत २०१६ मध्ये राहुल गांधी यांनी केलेलं वादग्रस्त ट्विट आता राहुल गांधींची अडचण वाढवणार असल्याचं दिसत आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून मुंबई पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी मुंबईतील भोईवाडा कोर्टात राहुल गांधी गैरहजर राहिल्यानंतर कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

याबाबत वीर सावरकरांचे नातेवाईक रणजीत सावरकर यांनी सांगितले आहे की, सावरकर स्मारकच्यावतीने राहुल गांधी यांच्या विरोधात मुंबईतील भोईवाडा कोर्टात तक्रार दाखल केली होती. आम्हाला कालच कळाले की कोर्टाने याप्रकरणी पोलिसांना चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल गांधी यांनी २०१६ मध्ये वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल होतं, त्यानंतर संस्थेच्यावतीने मुंबईतीला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. शिवाय सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत राहुल गांधी विरोधात कोर्टात याचिका देखील दाखल केल्या गेली होती. अगोदरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी जामिनावर आहेत, त्यात आता वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या ट्विटचे प्रकरण पुढे आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसत आहे.