रुग्ण वाढत असल्यामुळे यंत्रणांचे कठोर उपाय ; आठवडाभर फक्त औषधांचीच दुकाने खुली

राज्यभरातील रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ होत असल्यामुळे पालिका यंत्रणांनी कठोर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील कळवा-मुंब्रा आणि दिवा हे परिसर विषाणू प्रसारासाठी संवेदनशील जाहीर करीत या क्षेत्रांना तसेच पुण्यातील कोंढवा, महर्षीनगरसह काही भागांना मंगळवारपासून ‘सील’ करण्यात आले आहेत. या भागांना पूर्ण टाळे लागणार असून  औषध दुकानाव्यतिरिक्त किराणा माल आणि भाजीपाला दुकाने बंद राहणार आहेत.  कळवा परिसरात गेल्या काही दिवसात १२ तर मुंब्रा परिसरात २ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिव्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे.  संशयित रुग्णांची संख्या मोठी असून त्यांचे चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. तरीही या भागांतील नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.  करोनाबाधित रुग्णसंख्या वाढू लागल्याने आता हे परिसर पूर्णपणे टाळेबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून पुढील आठवडाभर औषधांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत एका दिवसात ५७ नवे बाधितमुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत सोमवारी दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळले असून चार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा ४९० वर गेला आहे. त्यापैकी ३४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ५९ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर अजून १५० संशयित रुग्ण दाखल आहेत. पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून सोमवारी एका दिवसात ३७ नवे रुग्ण आढळले.

गरोदर महिलेचा मृत्यू..

मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेचा (वय ३० वर्षे) मृत्यू ४ एप्रिलला संध्याकाळी झाला. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सूत्रांनी सांगितले.