करोनामुळे स्थलांतरित कामगारांना गावी गेल्यानंतर काम मिळावं यासाठी मनरेगा योजनेला सरकारने बळ देण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मात्र, टि्वटमध्ये त्यांचे शब्द काहिसे उपरोधिक होते. शिवाय त्यांनी एक जुना व्हिडीओ पोस्ट करून मोदींना त्यांच्याच भाषणाची आठवणही करून दिली.

“घरी परतल्यानंतर या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी सरकारनं मनरेगा योजनेसाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे,” असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं.

मनरेगा ही रोजगार निर्मितीसाठी यूपीएच्या काळात तयार करण्यात आलेली योजना होती. सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या अपयशासाठी अशा योजनांचा दाखला दिला होता. तोच व्हिडीओ पुन्हा राहुल गांधी यांनी टि्वट केला आहे. त्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारचे आभार मानले, पण ते शब्द उपरोधिक होते. टि्वटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “यूपीएच्या काळात तयार झालेल्या मनरेगा योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४० हजार कोटींची तरदूत केली. मनरेगा योजनेचा फायदा आणि त्यातील दूरदृष्टी समजून घेतल्याबद्दल मोदी यांचे आभार मानतो.”

मोदींनी  त्यावेळी भाषणात मनरेगा योजनेची खिल्ली उडवली होती. त्याच योजनेसाठी त्यांनी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली, हे सांगताना राहुल गांधी यांनी #ModiUturnOnMNREGA असा हॅशटॅगही वापरला आहे. मनरेगाच्या बाबतीत मोदींनी यू-टर्न घेतला असं राहुल गांधी यांनी टि्वट म्हटलंय.