दगडफेकीच्या घटना आणि इंटरनेट सेवा बहाल केल्यानंतर खोटया बातम्या पसरवण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रशासनाने काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत तसेच जम्मूमध्ये सुरु झालेली २ जी मोबाइल सेवाही खंडीत करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. काश्मीरमध्ये आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. श्रीनगरमध्ये १९० पैकी ९५ शाळा सुरु झाल्या आहेत. पण मुलांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

काश्मीरमध्ये जनजीवन पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून ३५ पोलीस स्टेशनच्या हद्दीत निर्बंध शिथिल करत असल्याचे सरकारी प्रवक्ते रोहित कंसल यांनी शनिवारी जाहीर केले होते. पण २४ तासांच्या आत अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली आहे. श्रीनगरमध्ये दुकाने आणि अन्य व्यावसायिक कार्यालये शनिवारीही बंद होती. श्रीनगरमधल्या काही भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या.

काही युवक बाईकवरुन फिरुन कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दुकाने उघडू नका असे व्यापाऱ्यांना आव्हान करत फिरत होते. जम्मू, सांबा, कथुआ, उधमपूर आणि रीअसी या पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवार रात्रीपासून इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली होती. पण ऑनलाइन खोटया बातम्या पसरवण्यास सुरुवात झाल्याने इंटरनेट सेवा बंद करावी लागली असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.